पारोळा (प्रतिनिधी) -तालुक्यातील टोळी येथे श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी चे सचिव रविंद्र जमनादास पाटील यांनी वडील स्व.जमनादास श्रीधर पाटील यांच्या ६ व्या स्मृतीदिन निमित्ताने दिनांक २१ रोजी श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी च्या माध्यमातून गावातील ५१ जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांना वडीलांची आठवण म्हणून आधारकाठीचे वाटप केले. म्हातारपणी चालतांना प्रत्येकालाच काठीचा आधार घेऊन पाऊल टाकावे लागते. आपल्या वडीलांच्या स्मृती म्हणून एक चांगला व समाजोपयोगी उपक्रम राबवत श्रद्धांजली दिल्याचे आदर्श उदाहरण जनतेसमोर ठेवल्याची भावना श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी चे संस्थापक अध्यक्ष डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी बोलून दाखवल्या. रविंद्र पाटील यांनी स्वतः आपल्या नाशिक शहरातील वाघेश्वरी वेल्डिंग वर्कशॉप मध्ये या काठ्या बनवून वडिलांची आठवण म्हणून जेष्ठ नागरिकांना दिल्याचे सांगत गावातील नागरिकांनी सुध्दा याचा आदर्श घेत आपल्या प्रियजणांचा स्मृतीदिवस साजरा करावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी केले.
कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर हून आलेले टोळी गावाचे सुपुत्र व संत कबीर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रविंद्र पाटील यांनी गावातील वयोवृद्ध माता पित्या समान असणाऱ्या ५१ ग्रामस्थांना आधारकाठी देवून त्या सर्वांमध्ये आपल्या वडीलांना पाहायचे स्वप्न पूर्ण केल्याची भावना बोलून दाखवली. काठीची किंमत कदाचित १५० ते २०० रुपये असेल पण या ठिकाणी किमंत गौण ठरते कारण त्या काठीत मायेची भावना ओतपोत भरलेली आहे जे लाखो रुपये खर्च करूनही त्याची बरोबरी करु शकत नाही. या कार्यक्रमात मला सहभागी होता आले हे मी माझे भाग्य समजतो व आजपर्यंत मी आई, वडील व बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक कार्यक्रम आयोजित केले पण ते कर्मभूमीत या कार्यक्रमामुळे मला देखील जन्मभूमीत कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना सरांनी बोलून दाखवली. कार्यक्रमासाठी खासकरुन बदलापूर हुन आलेले प्रमुख पाहुणे सुभाष पाटील यांनी आपण पैशांनी किती श्रीमंत आहात या पेक्षा मनाने किती समृद्ध आहात हे रविंद्र पाटील यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याची भावना बोलून दाखवली. टोळी गावाच्या प्रथम नागरिक पोलीस पाटील नलिनी पाटील यांनी श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी च्या माध्यमातून नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याबद्दलचे समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वास पाटील यांनी घेतलेले परीश्रम व गावातील जेष्ठ नागरिकांनी आधारकाठी घेऊन उपकृत केल्याबद्दल रविंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानत भविष्यात देखील श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी च्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत राहण्याचे आश्वासन दिले.